विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात न येऊ देता अभिमत विद्यापीठ ही संकल्पनाच रद्द करणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. पण भवितव्य धोक्यात न येऊ देणं, म्हणजे नेमकं काय? याचा विचार आता व्यावहारीक पातळीवरही करण्याची गरज आहे. कारण अभिमत विद्यापीठांच्या मूळ संकल्पनेलाच अनेक संस्थाचालकांनी हरताळ फासल्याचं सांगितलं गेलं. पण खरा विषय तर पुढेच आहे. कारण रद्द केलेली विद्यापीठं आणि त्यातले विद्यार्थी सामावून कसे घेणार हा खरा प्रश्न आहे.
पहिल्या टप्प्यात ज्या 44 अभिमत विद्यापीठांची मान्यता रद्द करणार असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे, त्यात राज्यातली तीन आहेत. राज्यातल्या विद्यापीठांची संख्या आणि क्षमता लक्षात घेता, त्यातले हजारो विद्यार्थी संलग्न विद्यापीठाशी जोडले जातीलही. पण ते तर्कसंगत आणि व्यवहार्य असणार नाही. विद्यार्थ्यांना संलग्न विद्यापीठांशी जोडणं म्हणजे नेमकं काय?
अशा विद्यार्थ्यांनी आजपासून अभिमत विद्यापीठांऐवजी राज्य विद्यापीठांची परीक्षा द्यावी, असं म्हणणं जितकं हास्यास्पद तितकंच बंद केलेल्या विद्यापीठांना महाविद्यालयासारखं कामकाज करता येऊ शकतं, हे म्हणणं. हे हास्यास्पद अशासाठी, कारण, दोन्ही विद्यापीठांचे अभ्यासक्रम, शिकवण्याची पद्धत, परीक्षा पद्धत ही भिन्न आहे, असतेच. मग ते विद्यार्थी एका प्रकारच्या विद्यापीठात शिकून अचानक दुसऱ्या विद्यापीठाची परीक्षा कसे देणार? हा अन्याय विद्यार्थ्यांवर की शिक्षणव्यवस्थेवर? दोन्ही विद्यापीठांच्या परीक्षा वेगळ्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलं जाणारं प्रमाणपत्र याचा दर्जा काय मानावा, असा प्रश्न आहेच. शिवाय आधीच्या म्हणजे अभिमत विद्यापीठात एखादा विद्यार्थी एटीकेटी घेणारा असेल तर संलग्न विद्यापीठात प्रवेश देताना काय म्हणून देणार? आधीच्या विद्यापीठात एखाद्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल पण नव्या विद्यापीठाशी जोडलं जाताना तो पुन्हा तोच अभ्यास करणार का? किंवा आधीच्या विद्यापीठात असा अभ्यास झालाच नसेल तर नव्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तो किती मागे पडेल?
काही अभिमत विद्यापीठात पीएच. डी. च्या स्वतंत्र पद्धती आहेत. त्या नव्या विद्यापीठाच्या नियमावलीशी सुसंगत नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? केवळ नव्या विद्यापीठाचे निकष वेगळे म्हणून त्यांना नव्यानं अभ्यास करायला सांगायचं की निकषच बदलायचे? दूरस्थ अभ्यासक्रमांचंही फारसं वेगळं नाही. म्हणजेच राज्य विद्यापीठांमध्ये नसलेले अभ्यासक्रम जर अभिमत विद्यापीठात शिकवले जात असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचं काय? त्यांना एखाद्या संलग्न विद्यापीठाशी जोडता येईल. पण हे संलग्न विद्यापीठ त्यांच्या सध्याच्या अभिमत विद्यापीठाच्या परिसरात असेलच असंही नाही. म्हणजेच विद्यापीठ बदलले की विद्यार्थ्यांची राहण्याची ठिकाणं बदलावी लागणार. साहजिकच एकीकडचे लोंढे दुसरीकडे. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न त्या त्या शहरांवर किंवा विद्यापीठांवर.
ज्या विद्यार्थ्यांनी अभिमत विद्यापीठांची फी भरलीय. त्यांना नव्या विद्यापीठात सामावून घेताना त्यांची फी कोण भरणार? अभिमत विद्यापीठांनी आकारलेली वेगवेगळी शुल्कं आणि खर्च, हे नव्या विद्यापीठाला कसं देणार? अशा विद्यार्थ्यांचा भार सरकार उचलणार का? हा प्रश्न आहेच. अभिमत विद्यापीठांकडे असलेलं मनुष्यबळ, इमारती आणि इतर पायाभूत सुविधा याचा वापर नंतर सरकार किंवा विद्यापीठ कसं करणार? याचा विचार आधीच करावा लागणाराय.
ज्या अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम चालवले जातात, तिथल्या विद्यार्थ्यांना सामावून घेतील, अशी किती विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत. वैद्यकीय असा विषय निघाला की नाशिकचं नाव येतं. पण उदाहरणादाखल असं घडेल असं मानलं तरी, पुण्यात शिकणारे विद्यार्थी नाशिकशी कशा पद्धतीनं जोडले जाणार? त्यावर वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल. मुळात असे विद्यार्थी सामावून घ्यायला आधीच्या विद्यापीठांची क्षमता आहे का आणि ती वाढवायला यंत्रणा आहे का? हे प्रश्न आहेतच. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही प्रश्न आहेच.
अभिमत विद्यापीठातले पात्रतेचे निकष, नोकऱ्यांच्या बढत्या, जागा, सर्व्हिस बुक, याचं नव्या विद्यापीठात स्थान काय? शिक्षक म्हणून त्यांची योग्यता, पात्रता असेलही. पण नव्या विद्यापीठात निकषच वेगळे असतील तर सेवासलगता, सेवाज्येष्ठता यावरून नव्या वादाला सुरवात होऊ शकते. मुळात असे शिक्षक सामावून घेण्यासाठी राज्य सरकारला आपल्या विद्यापीठांची क्षमता वाढवावी लागेल. हे सगळं सरकार करेल, असं अपेक्षित आहे. कारण सर्वोच्च न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र देताना संलग्न विद्यापीठात "त्या' विद्यार्थ्यांना सामावून घेतलं जाईल, असं सांगितल्यावर "सामावून घेणार म्हणजे नक्की काय करणार?' हा प्रश्न न्यायालय विचारणारच. त्याचं उत्तर सरकारला तयार ठेवावं लागेल.
अभिमत विद्यापीठांची मान्यता रद्द करण्याचा विचार सरकारनं थेट न्यायालयापुढे मांडलाय. पण विद्यार्थ्यांचं नुकसान करू देणार नाही, असं सांगून सरकारनं पहिल्या टप्प्यात तरी रोष कमी केलाय. पण हे असं अचानक का झालं? त्याचे विद्यार्थी पालकांच्या मनावर थेट परिणाम काय होणार? याचा विचार आधीच करावा लागेल. मान्यता रद्द करण्यापर्यंत अभिमत विद्यापीठांची स्थिती बिकट होती, तर आधीच पावलं का उचलली नाहीत, हा पहिलाच प्रश्न न्यायालय उपस्थित करू शकतं. आत्तापर्यंत झालेल्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली का? या प्रश्नाला काय उत्तर असेल. बरं, सगळं ठीक चाललं होतं, तर मग एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? असं विचारलं जाईल. म्हणूनच म्हटलं की हा विषय वाटतो तितका सोपा नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आणि सरकारच्या निर्णयाच्यादृष्टीनंही.
एकीकडं देशभरात उच्च शिक्षणासाठीचा टक्का वाढवण्यासाठी हजारो महाविद्यालयं आणि शेकडो विद्यापीठांची गरज असताना "अभिमत' विद्यापीठांवर कारवाई का? हा प्रश्न आहे. नाव बदलून का होईना, वेगळ्या संकल्पनेसह अशी विद्यापीठं किंवा शिक्षण संस्था सरकारला उभा कराव्याच लागतील. गरज आहे ती चांगले निकष आणि नियंत्रणाची, झाल्या चुका सुधारण्याची.
- स्वप्नील
दि. 22 जानेवारी 2010
Friday, January 22, 2010
Tuesday, January 19, 2010
रियॅलिटीशी स्पर्धा...
गेल्या काही दिवसातली सगळ्यात चर्चेत राहिलेली घटना म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या। त्या का होतायत? आणि थांबण्यासाठी काही करणार आहोत की नाही? असा एकमेकांना सवाल. स्पर्धा हे त्यामागचं एक ठळक कारण. मग ती रियॅलिटी शोमधली स्पर्धा असो किंवा आयुष्यातल्या रियॅलिटीशी. त्या स्पर्धेत तग धरून राहणारी पुढची पिढी तयार करण्यात आपण अपयशी ठरतो आहोत का? हा खरंतर या ब्लॉगचा आजचा विषय.
स्पर्धा प्रत्येक पिढीत असते. आत्महत्त्या पूर्वीही व्हायच्या आत्ताही होतायत. पण आज सहनशक्ती संपत चालल्यानं आत्महत्त्यांची संख्या आणि गांभीर्य वाढलंय हे नमूद करायलाच हवं. त्याला कारणीभूत आहे ती आजची परिस्थिती. अर्थात सगळं परिस्थितीवर ढकललं की आपण मोकळे होतो. थोडक्यात, "ही जबाबदारी सगळ्यांची असं म्हटलं की कुणाचीच नाही,' हे वेगळं सांगायला लागत नाही.
खरंच आत्महत्त्या कराविशी वाटणं? हे निव्वळ रियॅलिटी शो आणि शाळेतल्या गुणपत्रिकेवरची लाल रेष, याच्याशी जोडता येईल? अशा लाल रेषा असणारे सगळेच आत्महत्त्या करतात? आपण आत्महत्त्या करतो आहोत म्हणजे काय?, हे समजण्याइतकं त्या मुलामुलींचं वय होतं? याला केवळ टीव्ही-सिनेमा जबाबदार आहे, असं म्हणता येईल? हे प्रश्न स्वतःसाठी म्हणून मुद्दामच उपस्थित केलेत. यात सर्वस्वी दोष परिस्थितीचा नाही. आपण सगळेच दोषी. म्हणूनच आपापल्या वाटणीची जबाबदारी निश्चित करावी म्हणून हा लेखनप्रपंच.
रियॅलिटी शो मध्ये मुलं भाग घेतात. स्पर्धा होते. एसएमएस येतात. कुणी जिंकतं, कुणी हरतं. परीक्षक सांगतात "कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार'. पण हरणारा मीच का? हा प्रश्न निरुत्तर करणारा, स्वतःला. मी हरलो म्हणजे नेमकं काय झालं? हा प्रश्नही निरुत्तर करणारा, स्वतःला. ते समजण्याचं त्यांचं वयही नाही आणि गरजही नाही.
स्पर्धा ही स्पर्धेसाठी असते. जिंकण्यासाठी असते. पण जिंकणं म्हणजे काय? गिफ्ट व्हाऊचर्स? सिंगापूर ट्रीप? गाण्याचा अल्बम? लाखभर रुपये? एखाद्या सिनेमात नाचायची संधी? या सगळ्यापेक्षा जीव महत्वाचा नाही? पण हे सांगणार कोण? ही जबाबदारी पालकांची नाही? स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते, पण ती शिकण्यासाठीही असते हे कोण सांगणार? कुणीतरी जिंकतं-कुणीतरी हरतं, हे म्हणायला सोपं आहे, पण ते समजावून द्यायला नको? स्पर्धेत मुळात आपण कधीच हरत नसतो. लौकिकार्थानं तर नाहीच नाही. हे पालकांनीच सांगायला हवं. आपल्या मुलामुलींनी स्पर्धेत भाग घ्यावा पण तो निव्वळ जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी, असं किती पालकांना वाटतं?
"कालच्या स्पर्धेपेक्षा आजच्या स्पर्धेत तुझ्या परफॉर्मन्समध्ये काय सुधारणा झाली?', असं किती पालक मुलामुलींना विचारतात. स्पर्धा ही कधीच इतरांशी असत नाही. ती असते स्वतःशी. आपल्याजवळ असलेल्या अस्त्रशस्त्रांनी आपण लढाई करावी. इतरांच्या भात्यात कुठला बाण आहे, आणि तो आपल्या भात्यात का नाही? हे काही निराश होण्याचं कारण नाही. माझ्या भात्यात असलेल्या बाणानं मी किती चांगली लढाई करू शकतो, हे महत्वाचं. पण एवढी सूट किती पालक देतात? तू तसाच गायला हवास किंवा तू तिच्यापेक्षा चांगली नाचायला हवीस, हा आग्रह पाल्यांना किती मारक ठरतो, याचा विचार होतो कुठे?
जिंकणं काय किंवा हरणं काय, हे शब्द त्या लहानग्या स्पर्धकांच्या मनात भरवतं कोण? इतक्या लहान वयात त्यांना या दोन्ही घटनांचा अर्थ तरी कळतो काय? बक्षीस हे निमित्त असतं ते अंगभूत कलेला प्रोत्साहन म्हणून. त्याचं महत्व तेवढंच. पण तेच बक्षीस निमित्त नव्हे तर सर्वस्व वाटायला लागलं की असे गोंधळ होतात.
आयुष्यात कितीतरी अशा स्पर्धा असतात. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत यश मिळालं नाही, तर सर्वस्व संपलं, असं वाटायला कुणामुळे लागतं? तू जिंकलाच पाहिजेस, किंवा तू पहिलाच आला पाहिजेस हा अट्टहास कुणासाठी? कशासाठी? पालक, नातेवाईक, आजूबाजूची मंडळी या सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात आणि त्याचं ओझं नकोसं झालं की आत्महत्त्या करावीशी वाटते, स्पर्धा हरल्यावर आणि परिक्षेत नापास झाल्यावर. शिक्षण क्षेत्रात तर तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे नापास होणं हे अजिबात परवडणारं नाही. शैक्षणिकदृष्ट्याही आणि आर्थिकदृष्ट्याही. अभ्यास करायलाच हवा, पण तो ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. पण म्हणून आपल्या अपेक्षाचं ओझं पाल्यांवर का लादायचं? "मी शाळेत पहिला आलो नाही, पण तू यायला हवास'? हा अट्टहास कशासाठी? म्हणजे तुमची स्वप्नं पूर्ण करायला पुढची पिढी. मग आत्ताच्या पिढीचा कोंडमारा होतो. ती पिढी आधीच्या पिढीची स्वप्नं पूर्ण करायला धावत राहते. त्यांचं जगणंही राहून जातं आणि स्वप्नं पूर्ण करणंही. त्यांची राहून गेलेली स्वप्नं मग पुढच्या पिढीत. तिथून पुन्हा पुढच्या पिढीत. हे चक्र कुठल्या तरी पिढीत संपणार आहे की नाही? आपण ते संपवणार आहोत की नाही?
अजिबातच कुणाचं नियंत्रण नाही आणि मन मानेल तसं वाग, असं या सगळ्या लिखाणामागचा उद्देश नाही. पण पालक आणि पाल्यांचा सुसंवाद घडावा, अशा तळमळीनं हे सगळं लिहीलंय. वक्तृत्व किंवा वाद-विवाद स्पर्धांचा 350 हा विक्रमी आकडा ओलांडून मी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उभं राहणं थांबवलं तेंव्हा यातल्याच अनेक गोष्टींचा विचार केला होता. माझे पालक, शिक्षक आणि त्यावेळचे सहस्पर्धक, मित्र, यापैकी कुणीच, कधीच निव्वळ स्पर्धेसाठी नव्हते. हरणं-जिंकणं असतंच. पण ते लौकिकार्थानं नव्हे. स्पर्धा ही आपल्यासाठी असते. म्हणूनच आम्ही नुसत्या स्पर्धा केल्या नाहीत, तर स्पर्धा जगलो. म्हणूनच बक्षीस मिळाल्याचा उन्माद नाही आणि नारळ मिळाल्याचं दुःख नाही. प्रत्येक व्यासपीठावर जाताना आणि खाली उतरताना एकच प्रश्न या स्पर्धेनं मला काय शिकवलं?
- स्वप्नील19 जानेवारी 2010
स्पर्धा प्रत्येक पिढीत असते. आत्महत्त्या पूर्वीही व्हायच्या आत्ताही होतायत. पण आज सहनशक्ती संपत चालल्यानं आत्महत्त्यांची संख्या आणि गांभीर्य वाढलंय हे नमूद करायलाच हवं. त्याला कारणीभूत आहे ती आजची परिस्थिती. अर्थात सगळं परिस्थितीवर ढकललं की आपण मोकळे होतो. थोडक्यात, "ही जबाबदारी सगळ्यांची असं म्हटलं की कुणाचीच नाही,' हे वेगळं सांगायला लागत नाही.
खरंच आत्महत्त्या कराविशी वाटणं? हे निव्वळ रियॅलिटी शो आणि शाळेतल्या गुणपत्रिकेवरची लाल रेष, याच्याशी जोडता येईल? अशा लाल रेषा असणारे सगळेच आत्महत्त्या करतात? आपण आत्महत्त्या करतो आहोत म्हणजे काय?, हे समजण्याइतकं त्या मुलामुलींचं वय होतं? याला केवळ टीव्ही-सिनेमा जबाबदार आहे, असं म्हणता येईल? हे प्रश्न स्वतःसाठी म्हणून मुद्दामच उपस्थित केलेत. यात सर्वस्वी दोष परिस्थितीचा नाही. आपण सगळेच दोषी. म्हणूनच आपापल्या वाटणीची जबाबदारी निश्चित करावी म्हणून हा लेखनप्रपंच.
रियॅलिटी शो मध्ये मुलं भाग घेतात. स्पर्धा होते. एसएमएस येतात. कुणी जिंकतं, कुणी हरतं. परीक्षक सांगतात "कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार'. पण हरणारा मीच का? हा प्रश्न निरुत्तर करणारा, स्वतःला. मी हरलो म्हणजे नेमकं काय झालं? हा प्रश्नही निरुत्तर करणारा, स्वतःला. ते समजण्याचं त्यांचं वयही नाही आणि गरजही नाही.
स्पर्धा ही स्पर्धेसाठी असते. जिंकण्यासाठी असते. पण जिंकणं म्हणजे काय? गिफ्ट व्हाऊचर्स? सिंगापूर ट्रीप? गाण्याचा अल्बम? लाखभर रुपये? एखाद्या सिनेमात नाचायची संधी? या सगळ्यापेक्षा जीव महत्वाचा नाही? पण हे सांगणार कोण? ही जबाबदारी पालकांची नाही? स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते, पण ती शिकण्यासाठीही असते हे कोण सांगणार? कुणीतरी जिंकतं-कुणीतरी हरतं, हे म्हणायला सोपं आहे, पण ते समजावून द्यायला नको? स्पर्धेत मुळात आपण कधीच हरत नसतो. लौकिकार्थानं तर नाहीच नाही. हे पालकांनीच सांगायला हवं. आपल्या मुलामुलींनी स्पर्धेत भाग घ्यावा पण तो निव्वळ जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी, असं किती पालकांना वाटतं?
"कालच्या स्पर्धेपेक्षा आजच्या स्पर्धेत तुझ्या परफॉर्मन्समध्ये काय सुधारणा झाली?', असं किती पालक मुलामुलींना विचारतात. स्पर्धा ही कधीच इतरांशी असत नाही. ती असते स्वतःशी. आपल्याजवळ असलेल्या अस्त्रशस्त्रांनी आपण लढाई करावी. इतरांच्या भात्यात कुठला बाण आहे, आणि तो आपल्या भात्यात का नाही? हे काही निराश होण्याचं कारण नाही. माझ्या भात्यात असलेल्या बाणानं मी किती चांगली लढाई करू शकतो, हे महत्वाचं. पण एवढी सूट किती पालक देतात? तू तसाच गायला हवास किंवा तू तिच्यापेक्षा चांगली नाचायला हवीस, हा आग्रह पाल्यांना किती मारक ठरतो, याचा विचार होतो कुठे?
जिंकणं काय किंवा हरणं काय, हे शब्द त्या लहानग्या स्पर्धकांच्या मनात भरवतं कोण? इतक्या लहान वयात त्यांना या दोन्ही घटनांचा अर्थ तरी कळतो काय? बक्षीस हे निमित्त असतं ते अंगभूत कलेला प्रोत्साहन म्हणून. त्याचं महत्व तेवढंच. पण तेच बक्षीस निमित्त नव्हे तर सर्वस्व वाटायला लागलं की असे गोंधळ होतात.
आयुष्यात कितीतरी अशा स्पर्धा असतात. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत यश मिळालं नाही, तर सर्वस्व संपलं, असं वाटायला कुणामुळे लागतं? तू जिंकलाच पाहिजेस, किंवा तू पहिलाच आला पाहिजेस हा अट्टहास कुणासाठी? कशासाठी? पालक, नातेवाईक, आजूबाजूची मंडळी या सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात आणि त्याचं ओझं नकोसं झालं की आत्महत्त्या करावीशी वाटते, स्पर्धा हरल्यावर आणि परिक्षेत नापास झाल्यावर. शिक्षण क्षेत्रात तर तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे नापास होणं हे अजिबात परवडणारं नाही. शैक्षणिकदृष्ट्याही आणि आर्थिकदृष्ट्याही. अभ्यास करायलाच हवा, पण तो ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. पण म्हणून आपल्या अपेक्षाचं ओझं पाल्यांवर का लादायचं? "मी शाळेत पहिला आलो नाही, पण तू यायला हवास'? हा अट्टहास कशासाठी? म्हणजे तुमची स्वप्नं पूर्ण करायला पुढची पिढी. मग आत्ताच्या पिढीचा कोंडमारा होतो. ती पिढी आधीच्या पिढीची स्वप्नं पूर्ण करायला धावत राहते. त्यांचं जगणंही राहून जातं आणि स्वप्नं पूर्ण करणंही. त्यांची राहून गेलेली स्वप्नं मग पुढच्या पिढीत. तिथून पुन्हा पुढच्या पिढीत. हे चक्र कुठल्या तरी पिढीत संपणार आहे की नाही? आपण ते संपवणार आहोत की नाही?
अजिबातच कुणाचं नियंत्रण नाही आणि मन मानेल तसं वाग, असं या सगळ्या लिखाणामागचा उद्देश नाही. पण पालक आणि पाल्यांचा सुसंवाद घडावा, अशा तळमळीनं हे सगळं लिहीलंय. वक्तृत्व किंवा वाद-विवाद स्पर्धांचा 350 हा विक्रमी आकडा ओलांडून मी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उभं राहणं थांबवलं तेंव्हा यातल्याच अनेक गोष्टींचा विचार केला होता. माझे पालक, शिक्षक आणि त्यावेळचे सहस्पर्धक, मित्र, यापैकी कुणीच, कधीच निव्वळ स्पर्धेसाठी नव्हते. हरणं-जिंकणं असतंच. पण ते लौकिकार्थानं नव्हे. स्पर्धा ही आपल्यासाठी असते. म्हणूनच आम्ही नुसत्या स्पर्धा केल्या नाहीत, तर स्पर्धा जगलो. म्हणूनच बक्षीस मिळाल्याचा उन्माद नाही आणि नारळ मिळाल्याचं दुःख नाही. प्रत्येक व्यासपीठावर जाताना आणि खाली उतरताना एकच प्रश्न या स्पर्धेनं मला काय शिकवलं?
- स्वप्नील19 जानेवारी 2010
Subscribe to:
Posts (Atom)